Agneepath Agniveer
वाशीम : आजकाल महिला तरुणी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात आपली छाप पडताना दिसत आहेत, वाशीम जिल्ह्यातील मनीषा नावाच्या तरुणीने सुद्धा ग्रामीण भागात राहून जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण केले आहे. ती भारतीय सैन्यात दाखल होणार असून वर्हाडातील ही शेतकरी कन्या अग्निविर म्हणून देशाची सेवा करणार आहे. मनिषाने प्राप्त केलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.
भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय तरुण आणि तरुणींसाठी साठी सशस्त्र दलांमध्ये तरुणांच्या भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना सुरु केली असून यावर्षी राज्यात अग्निवीरांची भरतीकेली जात आहे. ‘अग्निपथ’ योजनेच्या माध्यमातून तरुणांना सशस्त्र दलात सेवा करण्याची संधी निर्माण करण्यासाठी सर्व उपयुक्त प्रयत्न केले जात असून या योजनेमुळे तरुणांना नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षित आणि शिकण्यास आणि त्यांच्या आरोग्याची पातळी सुधारण्यास मदत होत आहे, तसेच रोजगाराच्या वाढत्या संधींमुळे तरुणांना विविध क्षेत्रात नवीन कौशल्ये शिकायला मिळणार आहेत. . अग्निपथ योजनेंतर्गत सशस्त्र दलाचा भाग असणारे उमेदवार ‘अग्निवीर’ म्हणून निवडल्या जाणार आहेत विशेष बाब म्हणजे यात तरुणींचा देखील सहभाग असणार आहे. अग्निवीर झालेल्या तरुणींना चार वर्ष सेवा देता येते. चार वर्षांनी वर्षांनी निवृत्त झाल्यावर त्यांना कायम नोकरीसाठी अर्ज करण्याची संधी असते. मुलींच्या प्रत्येक बॅचमधून सुमारे 25 टक्के मुलींना कायमस्वरूपी नोकरी दिली जाणार आहे.
तसे पहिले तर सैनिक सेवेत महिलांचा टक्का कमी असला तरी आता मुलीदेखील सैनिक सेवेकडे वळू लागल्या आहेत.
वाशीम जिल्ह्यातील काजळांबा येथील मनीषा राजकुमार उगले ही लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. तिचे वडील शेतकरी आहेत. मनीषाला इतर मुलींपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. आपण मोठे होऊन देश सेवेत जाण्याचा तिने निर्णय घेतला आणि अथक परिश्रम घेतले. मुंबई येथे तिने अर्ज केला. परीक्षा पास झाली. मैदानी चाचणी परीक्षेत यश संपादन केले. सर्व पात्रता पूर्ण करून ४ महिने प्रशिक्षण पूर्ण केले. लवकरच ती तिच्या गावी येत आहे. वडील शेतकरी कुटुंबातील असूनही त्यांनी केवळ मनीषालाच नव्हे, तर मनीषाची मोठी बहीण आणि भावाला शिकविले.
मनीषा ही ग्रामीण भागातील तरुणी आज देश सेवा करणार आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने सैनिक सेवेत यश संपादन करून मुलीही कुठेच मागे नाहीत, हे सिद्ध करून दाखविले. हा प्रत्येक मुलीचा सन्मान असून, माय बापाच्या कष्टाचे मोल केले. तिचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. मी ग्रामीण भागातील, त्यातही शेतकरी कुटुंबातील. मला शिकून देश सेवेतच जायचे होते. यासाठी माझे आई, वडील, बहीण, भाऊ, नातेवाईक आणि माझे शिक्षक यांचे पाठबळ मिळाले. आज मुली कुठेच मागे नाहीत. मुलींना कमी लेखू नका, तिला शिकू द्या, पाठबळ द्या. मुलींनीही कुठेच स्वतः ला कमी न लेखता जिद्दीने प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच यशस्वी व्हाल, अशे मनीषा उगले हिने सांगितले आहे.