water crisis
बाळापूर, (अकोला): लग्नाच्यावेळी सांगीतले असते तर कधीच या गावात आले नसते, आता माझी मुलगी लग्नाला आली, तरी या गावातील पाण्याची समस्या सुटत नाही, आमच्याकडे पाण्याचे खूप हाल आहेत. नदीपात्रात खड्डे खोदून पाणी आणावे लागते. पाण्यामुळे पोरांना बायका भेटते नाही. पोरं तशीच आहेत बिनलग्नाचे.” अश्या शब्दांत कवठा येथील महीला आपली व्यथा सांगतात.
सकाळचे बाळापूर बातमीदार श्री. अनिल दंदी यांनी ही बातमी दिली आहे. त्यानुसार बाळापूर तालुक्यातील कवठा गावात नागरिक नदी पात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत. हे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कवठा गावात धरण असतांना देखील गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
एकीकडे सुर्य आग ओकतोय आणि दुसरीकडे या रखरखत्या उन्हात कवठा येथील महीला, पुरुष, अबालवृद्ध पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे चित्र आहे. हंडाभर पाण्यासाठी दीड किलोमीटरची पायपीट करत गावकऱ्यांना नदीच्या पात्रात खड्डे करून खड्ड्यातून पिण्यासाठी पाणी काढण्याची कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे गावातील काही नागरिक विकत पाणी घेऊन आपली तहान भागवत आहेत. च्या पाण्यासाठी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मन नदीच्या पात्रात करण्यात आलेल्या झिऱ्यातून पाणी काढतात. या दूषित पाण्यावरच गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे.आपली सर्व कामे बाजूला टाकत दोन घोट पाण्यासाठी हे गावकरी रोज पायपीट करतात. कवठा येथे विदर्भ पाटबंधारे विभागाचे वतीने बॅरेज बांधन्यात आले आहे.
जमीनी गेल्या; पाण्याची समस्या सुटेना
कवठा येथील शेकडो एकर जमीन भुसंपादित करण्यात आली अनेक शेतकरि भुमीहीन झाले मात्र पिण्याच्या पाण्याची गावकर्यांची धडपड कायम आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासूनची घशाची कोरड कशी मिटणार असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
पाणीपुरवठा योजना कुचकामी
तालुक्यातील पाणी टंचाई निर्मूलनासाठी गावांमध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांमार्फत पाणी पुरवठा केला जातो. तालुक्यात कारंजा (रमजानपूर) येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांमार्फत १० गावांना पाणी पुरवठा केला जातो. लोहारा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून लोहारा व कवठा गावाला पाणी पुरवठा केला जातो. निंबा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून वझेगाव, निंबा गावाला पाणी पुरवठा केला जातो. या योजनांमधून कोट्यावधी रुपये खर्चून पाण्याची सोय करण्यात आली. मात्र सदर योजनेतील पाईप लाईन, विद्युत मीटर, नळ, पाणी साठा याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
लग्न समारंभानाही फटका
भीषण पाणीटंचाईचा फटका लग्नसमारंभाला बसत असून अनेकजण अकोला येथे कार्यक्रमाच्या आयोजनाला पसंती देत आहेत. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. कवठा गावात पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले. असे असतानाही हे आमचे काम नाही, ग्रामपंचायतीने पाणी समस्या सोडवावी म्हणून लोकप्रतिनिधी जबाबदारी झटकत आहेत.
कवठा येथील पाणी टंचाईबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर यावर उपाय योजना करण्यात येईल
– सय्यद ऐसानोद्दीन
तहसीलदार, बाळापूर