Ravikant Tupkar : महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची चिन्हे असून शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता स्वाभिमानीत बंड होण्याची शक्यता आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नेत्तृत्वावर गंभीर आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेवरच दावा ठोकला आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या समोर आता हे मोठे आवाहन उभं राहिलं आहे.
राजू शेट्टी यांच्या विरोधात खुले बंड
नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटत असतील तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही, अशा शब्दांत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्हा कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभी राहिली, त्यामुळे संघटना सगळ्या कार्यकर्त्यांची आहे, असे सुद्धा जाहीर करत रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या विरोधात खुले बंड पुकारले आहे.
चळवळीचा प्रवास मांडला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २ ऑगस्ट रोजी बुलढाणा येथे पार पडली यावेळी तुपकर यांनी आपल्या मनातील खदखद कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली. त्यांनी पक्ष नेतृत्व कसा अन्याय करत आहे, हा पाढा त्यांनी वाचला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटनेच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला आर रविकांत तुपकर हेच आपले नेते आणि संघटना असून ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असे सांगितले. रविकांत तुपकर यांनी यावेळी बोलतांना स्व.शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळापासून तर आतापर्यंत झालेल्या चळवळीचा प्रवास मांडला. या दरम्यान अनेक सोबती आले, एखादा टक्का गेले असतील मात्र जेंव्हापासून छातीला संघटनेचा बिल्ला लावला तेंव्हापासून लाखो कार्यकर्ते सोबत आहेत, वर्षाला कार्यकर्ते बदलण्याचा धंदा मी केला नाही. कार्यकर्त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे मला जपलं, माझ्यावर संकट आली तेंव्हा शेतकऱ्यांच्या पोरांनी छातीचा कोट करून माझी साथ दिली असे रविकांत तुपकरांनी सांगितले. स्व.शरद जोशी यांची शेतकरी संघटना सोडल्यानंतर सदाभाऊ खोत आणि मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढविली आहे.
तुपकरांनी मांडली व्यथा
दोन दोन -तीन- तीन महिने घरापासून दूर राहिलो, संघटनेसाठी स्वत:ला गाडून घेतलं. घरादाराची, लेकरांची पर्वा केली नाही शेकडो गुन्हे अंगावर घेतले, जेलात गेलो परंतु संघटना आणि चळवळ जिवंत ठेवली. परंतु दरम्यानच्या काळात पक्षातील काही नेत्यांकडून पंख छाटण्याचे काम होत आहे. आपला कार्यकर्ता मोठा होत असेल, त्याचे नेतृत्व फुलत असेल तर नेत्याच्या पोटात दुखायला नको. नेतृत्वाने आपल्याच कार्यकर्त्यांचे पंख छाटणे यापेक्षा आयुष्यातील मोठे दुर्दैव नाही, अशी व्यथा तुपकरांनी मांडली. आपल्या सोबत राहून आपलाच केसाने गळा कापला तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. माझ्याऐवजी दुसरं कुणी असतं तर आत्महत्या केली असती, मात्र माझं आयुष्य मी शेतकरी चळवळीसाठी, समाजासाठी अर्पण केलं आहे. त्यामुळे आत्महत्या करणार नाही. कार्यकर्त्यांच्या बळावर मी कुणाशीही खेटायला तयार आहे, असे तुपकरांनी सांगितले. २०१४ ला निवडणुकीसाठी आधी तयारी करायला आणि नंतर थांबायला सांगितलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून महामंडळ देण्याचा शब्द दिला.
- Advertisement -
- Advertisement -
दौऱ्याची कल्पना दिली जात नाही..?
सत्ता आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला. राजू शेट्टी आणि सदाभाऊ यांच्यात वाद झाले त्यावेळी सदाभाऊंना बाजूला करू नका असे मी त्यांना सांगितले मात्र त्यावेळी त्यांनी ऐकलं नाही. त्यांच्या शब्दाखातर मी राजीनामा दिला. २०१९ ला राजू शेट्टींनी लोकसभा निवडणुकीची तयारी करायला सांगितली, मात्र युतीमुळे तेव्हाव्ही माघार घ्यायला लावलं. विधानपरिषद मिळेल असे आघाडीत ठरले, मात्र राजू शेट्टींचा पराभव झाला आणि विधानपरिषदेसाठी शेट्टी साहेबांचे नाव पुढे केले. तर आता रविकांत तुपकर हेच लोकसभेचे उमेदवार असे राजू शेट्टी सांगतात असले तरी बुलढाणा जिल्ह्यात येतात आणि आम्हाला सांगत नाही..? हा काय प्रकार आहे.? दौऱ्याची कल्पना आम्हाला का दिली जात नाही..? असाही प्रश्न तुपकरांनी उपस्थित केला.
आमची चूक आहे का?
नेतृत्वाची भूमिका पालकत्वाची असायला हवी. नेतृत्वाने कार्यकर्त्याच्या पाठीवर हाथ ठेवत कार्यकर्त्याला बळ द्यायला पाहिजे. आम्ही बुलडाण्यात ५० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढला, सरकार बरोबर आम्ही स्वतंत्र चर्चा केली ही आमची चूक आहे का? याउलट नेतृत्वाला त्यासाठी आनंद व्हायला पाहिजे होता. आम्ही कार्यकर्त्यांनी संघटना घडविली, वाढविली आणि आता आम्हाला संघटनेतून काढण्याचे प्रयत्न होत आहेत. परंतु संघटना कुणाची खाजगी मालमत्ता नाही. आयुष्याचे २० वर्षे संघटनेसाठी दिले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्हा सर्व कार्यकर्त्यांचीच आहे, असेही यावेळी तुपकरांनी ठणकावून सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणाबाजीचा आवाज घुमला.
नव्या दमाची फौज उभी करणार
आपला २० वर्षांचा संपूर्ण प्रवास आणि अलीकडील काळात पक्षीय नेतृत्वाकडून होत असलेली प्रतारणा हे सर्व कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर आता काय करायचे तुम्हीच निर्णय द्या? असे रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांना विचारले असता सर्वांनी तुम्हीच आमचे नेते आणि तुम्हीच संघटना व पक्ष आहात, असा एकमुखी निर्णय जाहीर केला. त्यानंतर तुपकरांनी माझ्या सहकऱ्यांना व आम्हाला संपविण्याचा जो कुणी प्रयत्न करेल त्याला ‘ईट का जबाब पत्थर से देंगे’ असे म्हणत खास आपल्या स्टाईलने इशारा दिला. आमची ताकद केवळ बुलडाण्यात नाही, ज्या जिल्ह्यात पाऊल ठेवू त्या जिल्ह्यात ताकद निर्माण करू. राज्यभर शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पोरांच्या मागे उभं राहणार आहे. आता राज्यभर मोठी आणि नव्या दमाची फौज उभी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे तुपकरांनी जाहीर केले. दरम्यान आता खा. राजू शेट्टी काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.