Farmers Movement Maharashtra
बुलढाणा : पिकविमा (crop insurance), अतिवृष्टीची नुकसान भरपाई व सोयाबीन – कापसाच्या दरवाढ (Soybean – Cotton price)या महत्वाच्या विषयाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) गेल्या 4 दिवसांपासून भूमिगत होते. त्यांच्या आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर मोठा बंदोबस्त होता. पोलिसांना चकमा देण्यासाठी पोलिसांच्याच वेशात येवून रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. आत्मदहन करण्यापूर्वी पोलिसांनी त्याना ताब्यात घेतले आहे.
चक्क पोलिसांच्या वेषात पोहचले तुपकर
शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पिकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई व सोयाबीन – कापसाच्या दरवाढ याबाबत केंद्र व राज्य सरकार गंभीर नाही, असा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने ते हा प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून मांडत आहेत. मात्र सरकारकडून समाधानकारक तोडगा निघालेला नाही. अखेर आता आरपारची लढाई लढू असे सांगत त्यांनी स्वतः आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता. शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंव्हा AIC पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे रविकांत तुपकरांनी जाहीर केले होते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी आज पोलीस बंदोबस्त होता. तुपकर गेल्या चार दिवसापासून भूमिगत होते. आज ते काय पवित्रा घेतात याकडे लक्ष लागले होते. दरम्यान तुपकर बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्या कार्यकल्यासमोर चक्क पोलिसांच्या वेषात पोहचले.
शेतकऱ्यांच्या खात्यावर ९ कोटी ७८ लाख जमा
प्रशासनासह शेतकऱ्यांचा नजरा रविकांत तुपकर यांच्या आज होणाऱ्या आंदोलनाकडे लागल्या आहेत. दरम्यान तूपकरांच्या इशाऱ्यानंतर AIC पिकविमा कंपनीने ९ फेब्रुवारीच्या रातोरात स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या पात्र १५,२२१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९ कोटी ७८ लाख रु. जमा करण्यास सुरवात केली आहे. अनेकांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. परंतु नैसर्गिक आपत्ती अंतर्गत असलेल्या सर्वच पात्र अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा व्हावी, पोस्ट हार्वेस्टिंगचा विमाही तातडीने मिळावा व अतिवृष्टीची मंजूर असलेली नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी. तसेच सोयाबीन – कापूस दरवाढी संदर्भात सरकारने ठोस निर्णय घ्यावे, या मागण्यांबाबत तुपकर ठाम होते.
हा संघर्ष चालूच राहणार : रविकांत तुपकर
दोन दिवसापासून शहरात व तुपकर यांच्या घरापुढे तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्हाभरातून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तुपकर यांच्या निवासस्थानी व स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटरवर जमू होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास सौ. शर्वरी तुपकर व शेकडो कार्यकर्ते हातात फलक घेऊन व घोषणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचले. याच गर्दीत रविकांत तुपकर हे पोलिसांच्या ड्रेसमध्ये होते. मोर्चा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर येताच तुपकर यांनी अंगावर रॉकेल व डिझल घेतले. तेवढयात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हा संघर्ष चालूच राहणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले. दरम्यान त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मागण्या मान्य केल्याशिवाय जागचे हटणार नाही, असा पवित्रा घेतला होता. यावेळी त्यांच्यासोबत आलेलया शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच रविकांत तुपकर याना देखील पोलीस व्हॅन मध्ये अटक करून नेण्यात आले आहे.