Nagpur News
नागपूर : गेली १४ महिने तुरुंगात काढल्यावर राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) शनिवारी नागपुरात आले. यावेळी चाहत्यांनी देशमुख यांचे जंगी स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठा जनसागर उसळला होता. चाहत्यांसमोर अनिल देशमुख यांनी आपल्या तरुंगातील छळाची कहाणी सांगितली. सरकारने खोट्या गुन्हयात अडकवून त्रास दिला असे ते म्हणाले.
अजमल कसाब सारखा छळ
नागपुरात माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, मला खोट्या गुन्ह्यात ऑर्थर रोड तुरुंगात डांबून ठेवण्यात आले. माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई करून अटक करण्यात आली. पाकिस्तानी दहशतवादी कसाब याला ज्या इमारतीमध्ये ठेवण्यात आले होते, त्याच इमारतीत अजमल कसाब (Ajmal Kasab )सारखे मला ठेवण्यात आले. तेथे त्याच पद्धतीने माझा छळ करण्यात आला, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख हे तब्बल 21 महिन्यानंतर पहिल्यांदाच शनिवारी नागपूर दाखल झाले. यावेळी विमानतळावर त्यांचे आगमन झाले असता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
गुन्हा केला नसतांना कारागृहात
स्वागतानंतर संविधान चौकात त्यांनी उपस्थित त्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, काँग्रेस,शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या स्वागताला हजेरी लावली याचा अर्थ महाविकास आघाडी अजून मजबूत आहे. यावेळी त्यांनी तुरुंगात झालेल्या छळाची कहाणी सुद्धा उपस्थितांसमोर कथन केली. देशमुख म्हणाले, न्यायदेवतेने अखेर मला न्याय दिला आहे . ऑर्थर रोड तुरुंगाच्या इमारतीत मला ठेवण्यात आले. तेथे खूप छळ झाला. ही इमारत तीन इंच जाड लोखंडी पत्राने झाकलेली आहे. पूर्वी मुंबई बाॅम्बस्फोटाचा गुन्हेगार व दहशतवादी अजमल कसाबलाही ठेवण्यात आले होते. मी कोणताही गुन्हा केला नसतांना मला कारागृहात राहावे लागल्याचे दुःख आहे.
न्यायदेवतेचे मानले आभार
माझा कोणताही गुन्हा नसताना तुरुंगात डांबण्यात आले. खरोखर मी काही केले असते तर त्याबाबत काही वाटले नसते. तुरुगात एक एक तास हा एक वर्षाप्रमाणे असतो. या सर्व प्रकरणात मी आणि माझ्या कुटुंबाला तसेच सहकाऱ्यांना खूप दुःख सहन करावे लागले. आम्ही सर्व भांबावून गेले होतो. त्याची आठवण आली की,आजही अंगावर काटा उभा राहतो. मला व माझ्या कुटुंबीयांना सातत्याने मानसिक त्रास दिला गेला. पण, मला न्याय दिल्याबद्दल मी न्यायदेवतेचे आभार मानतो, असेही देशमुख म्हणाले.
- Advertisement -
- Advertisement -
ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप
परमवीर सिंग यांच्यासोबत फौजदार सचिन वाजे यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. आरोप करणारा सचिन म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम आहे. त्याला दोन खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली होती तो सोळा वर्ष तुरुंगात होता त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येणार नाही असे उच्च न्यायालयाने सांगितले न्याय देताना न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली आहेत. शंभर कोटीच्या आरोपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नव्हते. ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केल्या गेले त्याचा कोणताही पुरावा सादर केला गेला नाही. खोटे आरोप केले. त्या परमवीरसिंग याला न्यायालयाने बोलावले होते. तो पाच महिने फरार होता. शंभर कोटीचे आरोप केले गेले. मात्र १ कोटी ४४ लाखांचे आरोप पत्र दाखल केले कुठे आरोप करून मला होण्याचा प्रयत्न झाला मात्र न्यायदेवतेने अखेर मला न्याय दिला असेही देशमुख म्हणाले. देशमुख यांच्या स्वागतासाठी विविध पक्षाची ज्येष्ठ नेते मंडळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते