Buldana : गेल्या तीन आठवड्यापासून के.वाय.सी लिंक प्रणाली बंद असल्यामुळे अतिवृष्टी चे अनुदान बँक खात्यात जमा होत नसल्यामुळे शेतकरी जाम वैतागले आहेत .शासनाने ही लिंक सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात वेग वेगळ्या प्रकारचे अनुदान नेहमी येत असते . परंतु येणाऱ्या सर्व अनुदानासाठी के वाय सी करणे अनिवार्य तर केले पण लिंक मात्र बे मुदत बंद ठेवायची असे शासनाचे धोरण असल्याचे दिसून येते. गेल्या २२ जुलै रोजी संग्रामपूर आणि जळगाव जा तालुक्यात तुफान अतिवृष्टी झाली त्या मुळे शेकडो एकर जमीन पाण्याच्या प्रचंड प्रवाहा मुळे वाहून गेली. एकट्या संग्रामपूर तालुक्यातील ४१६६ हेक्टर सुपीक जमीन काळी कसदार असलेली शेत जमीन खरडून गेली.उभी पिके वाहून गेली.नदी नाल्यांचे प्रवाह बदलले.गुरे ढोरे मरून पडली.शेती साहित्य वाहून गेले.घरेदारे पडझड झाली. शेतकरी या भूतो न भविष्यती अशा प्रचंड अतीवृष्टी मुळे पार नेस्तनाबूत झाला.प्रशासनाने याचा महिनाभर सर्व्हे केला. चार पाच महिन्यापासून शेतकरी मदतीची वाट पाहू लागला.गेल्या ११ नोहेंबरं रोजी आणि मग शासनाने गाव निहाय अनुदान प्राप्त शेतकऱ्यांची यादी तहसिलदारा मार्फत जाहीर केली.
या यादी मधे व्ही.के. वायसी नंबर हा संगणक प्रणाली मध्ये पडताळणी करावा लागतो .त्या साठी हि लिंक सुरू असणे अतिशय गरजेचे आहे.पण गेल्या तीन आठवड्यापासून ही प्रणाली बंद असल्यामुळे गाव खेड्यातील शेतकरी पदर चे पैसे खर्च करून तालुक्याच्या गावी येतो आणि लिंक बंद असल्याने परत जातो.पाच महिन्यापासून शासनाने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असून ह्या संगणक प्रणाली मुळे शेतकऱ्याला नसते हेलपाटे होत असल्याचे दिसून येते.त्या मुळे शासनाने के.वाय.सी लिंक सुरू करून लवकरात लवकर खात्यात अनुदान जमा करावे अशी मागणी शेतकऱ्या कडून होत आहे.
पालकमंत्री लक्ष देतील का ?
दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असून, पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील रविवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ते नुकसानीचा आढावा घेणार आहेत. पालकमंत्री दिलीप वळसे –पाटील हे रविवारी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 9 वाजता सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ येथे गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. त्यानंतर देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव, गिरोली आणि असोला जहागीर या गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते गारपीट व अवकाळी पावसामुळे बाधित शेतपिकांच्या नुकसानीसंदर्भात दुपारी 12.30 वाजता सिंदखेडराजा येथील पंचायत समिती सभागृहामध्ये जिल्हा यंत्रणेच्या संबंधित विभाग प्रमुखांसोबत आढावा घेतील. त्यांची दुपारी 1.30 ते 2.30 वाजेदरम्यान राखीव वेळ असेल. त्यानंतर ते सोईनुसार सिंदखेड राजा येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री लक्ष देतील का, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.