Compensation to farmers
मुंबई: अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कोकण व नागपूर विभागातील ४१ हजार ४७६ शेतकऱ्यांना २७ कोटी १८ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली. मराठवाड्यासह इतर विभागांसाठी राज्य शासनाने यापूर्वीच १७७ कोटींची मदत दिली आहे. सर्वाधिक नुकसान मराठवाडा विभागाचे झाले होते. त्यात छत्रपती संभाजीनगर विभागाला ८४ कोटींचीमदत दिली गेली आहे. या यादीत आपले नाव आहे का, हे जाणून घ्या…
राज्यात ४ ते ८ मार्च आणि १६ ते १९ मार्च या काळात राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडला होता. त्यामध्ये काढणीला आलेल्याशेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. त्या वेळी विरोधकांनी नुकसानभरपाईचा विषय लावून धरला होता. त्या वेळी पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदत केली जाईल, असे सरकारने जाहीर केले होते. महसूल विभागाकडून गेले महिनाभर यासंदर्भात पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाईंचे प्रस्ताव मंजूर करण्याचे काम सुरू होते. शासनाकडे याबाबतची अंतिम आकडेवारी हाती आल्यानंतर मदत जाहीर केली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेतपिकाचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईस पात्र ठरवण्यात आले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मधून सदर मदत दिली आहे. अवकाळी पाऊस ही आपत्ती असल्याने राज्य शासनाने घोषित केली आहे.
मार्च महिन्यात गारपीट आणि अवकाळी पावसने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. बळीराजाने मोठ्या कष्टाने पिकवलेलं पावसाने धुवून काढलं. अवकाळी पावसाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळं आणि पिकांवर पडत असलेल्या रोगराईमुळं शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढत आहे. उत्पन्नात मोठी घट होत आहे. यामुळे शेतकरी मात्र वारंवार संकटात सापडत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि रोगराईमुळं अनेक भागात पिके वाया गेली होती.शेतकऱ्याला आता रब्बी हंगामातील पिकांकडे आशा होती. परंतू, या महिन्यातही वारंवार बदलत असलेलं वातावरण आणि तापमान यामुळं पिकांवर अनेक विषाणूजन्य रोग पडत आहे. दरम्यान अवकाळी पाऊस, गारपीट या कारणामुळे शेतकरी वर्गाच्या हाताशी गेलेले पीक गेले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना पिकांवर अनेक औषधांची फवारणी करावी लागत आहे. या फवारणीचा मोठा खर्च आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या हाती शेवटी पैसे येणार याची शेतकऱ्यांना चिंता आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतकरी पुन्हा पुन्हा अडचणीत सापडत आहे. दरम्यान आता सरकारने मदत जाहीर केली आहे.
कोकणातील ३१ हजार शेतकऱ्यांना मदत : नागपूर विभागात १० हजार १७८ शेतकऱ्यांच्या ६ हजार ३५३ हेक्टर पीक क्षेत्रास ११ कोटी ८७ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. कोकण विभागात ३१ हजार २९८ शेतकऱ्यांना ७ हजार १४ हेक्टर पीक क्षेत्रासाठी १५ कोटी ३१ लाख नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. मार्चमध्ये झालेल्या अवकाळी व गारपीठीमुळे या दोन महसूल विभागात एकूण ४१ हजार ४७६ शेतकऱ्यांना १३ हजार ३६७ हेक्टर पीक क्षेत्रासाठी २७ कोटी १८ लाख रुपये महसूल विभागाने मंजूर केले आहेत. या यादीत आपले नाव आहे का, हे जाणून घेण्यासाठी तलाठी किंवा संबधीत विभागाशी संपर्क करावा ..
- Advertisement -
- Advertisement -
पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता; शोधून देणाऱ्यास ५१ रुपयांचा बक्षीस