Government job in Maharashtra : सरकारी नोकरीच्या शोधात असेलल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदमध्ये नोकरभरती सुरु केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील १०० टक्के व इतर विभागांकडील ८० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येत असून ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट-क मधील ३० संवर्गातील एकूण १९ हजार ४६० इतकी पदे सरळसेवेने भरण्याबाबतची प्रक्रिया शनिवार (आज) पासूनच सुरू होणार आहे. या भरतीची जाहिरात शनिवार, ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
मंत्री महाजन म्हणाले, मार्च, २०१९ मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही. यानंतर शासनाच्या विविध विभागांद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगा भरती करण्यात येत आहे. यामध्ये ५ ऑगस्ट २०२३ ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे.
जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. जाहिरातींच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरता आवश्यकशैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती आदी बाबी संबंधित जिल्हा परिषदांच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरता अर्ज करावा. अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस कंपनीमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला कोणत्याही उमेदवाराने बळी पडू नये, अशी विनंती आहे, असेही म्हणाले.