Government job in maharashtra : ठाण्यातील शासकीय रुग्णालयांत मागील आठवड्यात २७ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने लवकरच आरोग्य विभागात गट ‘क’ आणि गट ‘ड’ वर्गातील सुमारे १२ हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पुढील आठवडाभरात जाहिरात काढण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रशासनाकडून त्याच्या तयारीची सुरुवात केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागात नोकरभरती झालेली नाही. कोरोना काळात मनुष्यबळाची कमतरता असल्याने नोकरभरतीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. परिणामी गेली दोन वर्षे संबंधित परीक्षेचा निकाल लावूनही काहीही पावले उचलली गेली नाहीत. दरम्यान, मागील आठवड्यात एका रात्रीत ठाण्यातील शासकीय रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यात डॉक्टरांसह इतर मनुष्यबळाची कमतरता असल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
या घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले असून, गट ‘क’ आणि गट ‘ड’ वर्गातील सुमारे ११ हजार ९०३ जागांसाठी नोकरभरतीची जाहिरात काढण्यास मंत्रीस्तरावरून परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आरोग्य विभाग प्रशासनाने याची तयारी सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात तातडीने जिल्हानिहाय किती जागा भरायच्या याची पडताळणी सुरू केली आहे. त्यानुसार पुढील आठवडाभरात जाहिरात काढली जाणार आहे. या नोकरभरतीसाठी एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्यामार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, लिपिक, टंकलेखक आदी पदांचा समावेश आहे. तर गट ‘ड’ संवर्गात वाहनचालक, शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक आदी पदांचा समावेश आहे.