Manoj Jarange-Patil : कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील ५० लाख मराठा समाजाचा वर्ग तीनमधून वर्ग २ अमध्ये समावेश होण्यासाठी सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन सरकारविरोधात लढा उभा करावा, त्या लढ्याला माझे संपूर्ण पाठबळ असेल, यासाठी मी तुमच्यासोबत आहे, असा निर्धार मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला.
कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील भालकी येथे आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची बुधवारी जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जगद्गुरू वेदांताचार्य मंजुनाथ भारती व मनोज जरांगे-पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जरांगे-पाटील यांनी भालकीतील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जरांगे-पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी जरांगे-पाटील म्हणाले, कर्नाटकातील मराठा समाज एक झाला तर सरकार हादरेल, संघटना मजबूत करण्यासाठी आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी आमरण उपोषणासह कोणत्याही संघर्षाला तयार आहे. मराठा समाजाचा वर्ग ३ मधून वर्ग २ अ मध्ये समावेश करण्याची मागणी आहे. यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू असला तरी सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. समाजाच्या संघटनात्मक शक्तीचा अभाव हे त्याचे कारण आहे. मराठा एकजूट राहिला तर सरकारला हादरा देऊ शकतो, कर्नाटक राज्यातील ५० लाख मराठा जनतेने आवाज उठवून संघटितपणे लढ्यात उतरल्यास ही मागणी पूर्ण होणार आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी मी इथे आलो आहे.
समाज म्हणजे आई-वडील,कुटुंब, नातेवाईक. मी समाजासाठी जगतो, वेळ पडली तर मरायलाही तयार आहे. कर्नाटकातील मराठा समाजाने आपली ताकद काय आहे, हे देशाला दाखवून द्यावे, मी तुमच्या सोबत आहे. समाजात २ अ श्रेणीच्या समावेशासाठी लढा तीव्र करण्यासाठी चळवळ सुरू करूया, ही मागणी पूर्ण होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, युवकांच्या हाताला काम मिळावे. अन्यायाविरोधात लढले पाहिजे, मराठा मुलांसाठी आरक्षण दिले पाहिजे, तुम्ही नाही दिले तर छताडावर बसून घेऊ, मला जीवाची पर्वा नाही, मी देशातील मराठा एकत्र करणारच, तुम्ही स्वतःला एकटे समजू नका, मी तुमच्यासोबत आहे, आपापसात भेदभाव करू नका, महाराष्ट्रात २५-२५ वर्षे न बोलणारे मराठे एकत्र केले, आपली जात संपली तर तुम्हाला कोणीच विचारणार नाही, तन-मन-धनाने सोबत राहा, व्यसनी बनू नका, मला संपवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. मला महाराष्ट्रातून तडिपार करण्याचा, जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा प्लॅन होता. मी जेलमध्ये गेलो तरी तेथे गप्प बसणार नाही, तेथूनही लढणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी बिदर, कलबुर्गी, धारवाड, हुबळी, लातूर, उदगीर, सोलापूर आदी भागातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.