Marriage story
बुलडाणा : ऐन लग्न मुहूर्ताच्या वेळी करीना कपूर लग्न सोहळ्यातून पळून जाते हा प्रसंग गाजलेल्या थ्री इडियट या चित्रपटात आपण पाहिला असेल. चित्रपटात शोभावी अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात घडली आहे. ऐन लग्न मुहूर्तावर नवरी पडून गेली मात्र गावकऱ्यांच्या पुढाकाराने नवरदेवाला दुसरी नवरी मिळाली आणि त्याचे शुभमंगल पार पडले. पुण्यनगरीचे डोणगाव प्रतिनिधी जमीर शाह यांनी ही बातमी दिली आहे…
पसंती आणि साक्षगंध
दोन महिन्यांआधी मुला, मुलीची पसंती झाली. साक्षगंध झाला, बस्ता फाडला आणि १३ मार्चला दुपारी साडेबाराचा लग्नमुहूर्त ठरला. दोन्हीकडील मंडळींनी विवाहाची तयारी केली. नवरदेव, नवरीला हळद लागली. विवाह मुहूर्ताचा दिवस उजाडताच चिखली तालुक्यातील एका गावात विवाह सोहळ्याची तयारी सुरू झाली.
नवरदेव निघणार तोच….
मेहकर तालुक्यातील एका गावातून नवरदेवासह वन्हाड लग्न लावण्याकरिता निघण्याची तयार करू लागले. तेवढ्यात नवरी मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळाल्याची बातमी धडकली आणि सर्वजण चिंतीत झाले.१३ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजताचा मुहूर्त ठरला होता. मात्र ऐन वेळी भलतंच घडलं. नवरी मुलगी दुसऱ्या युवकासोबत पळून गेली.लग्नतिथी टळू द्यायचा नाही तसेच लग्नास एखादी मुलगी व तिच्या घरची मंडळीही तयार व्हावी, यासाठी सुजाण नातेवाइकांनी पुढाकार घेत वधूचा शोध घेतला. मुलगा सुशिक्षित व कमावता असल्याने गावातीलच एका मुलीसोबत नवरदेवाचे लग्न लावून देण्यात आले.
नागरिकांच्या साक्षीनं शुभमंगल
नवरी पळाल्याचे समजल्यानंतर वऱ्हाड निघालेच नाही. नवरा मुलगा सुशिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभा असल्याने अनेकांनी असे घडायला नको होते म्हणत हळहळ व्यक्त केली. दरम्यान, गावातील काही सुजाण नागरिकांनी पुढाकार घेत या मुलाची संसारवेल फुलवण्याचे ठरले. विचार विनिमय करून आजच्याच तारखेत लग्न लावण्याचे ठरवण्यात आले. जातीमधीलच एक मुलगी शोधण्यात आली. तिचा व तिच्या घरच्यांचा विचार घेण्यात आला. होकार मिळाल्यानंतर १३ मार्चला सायंकाळी सात वाजता गावकऱ्यांच्या या तरुणाचा विवाह पार पडला.