मूर्तिजापूर (अजय प्रभे) : सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीच्या आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने सर्वच क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली असून जगात भारताची मान उंचावली असल्याचे प्रतिपादन आमदार हरीश पिंपळे यांनी (MLA Harish Pimple) येथे केले.
येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी डीपीसी व कृउबास संचालक डॉ.अमित कावरे, भाजपा जिल्हा सचिव सचिन देशमुख, तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, शहराध्यक्ष रितेश सबाजकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, तालुकाध्यक्ष पप्पू मुळे, शहर उपाध्यक्ष कोमल तायडे, कमलाकर गावंडे, राजु कांबे, अविनाश यावले, हर्षल साबळे, लखन अरोरा, चेतन सदार, हितेश चौधरी, अक्षय जोशी उपस्थित होते.
आमदार पिंपळे पुढे म्हणाले, की कधी नव्हे एवढी प्रगती गेल्या नऊ वर्षांत झाली आहे. जागतिक महामारीच्या संकटामध्ये देशाने परिस्थिती गांभीयने हाताळली. नवीन संसद निर्माण केली. साडेतीन कोटी लोकांना घरे, पावणे बारा कोटींना इज्जत घर, बारा कोटी घरांमध्ये पिण्याचे पाणी, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सर्वांना आरोग्य, साडेनऊ हजार ठिकाणी प्रधानमंत्री जन औषधी केंद्र, यासह वॉटर वे, मेट्रो, सरदार पटेल यांचा पुतळा, डिजिटल ट्रांजेक्शन व ३०० ठिकाणी प्रधानमंत्री जन औषधी केंद्र या सर्व प्रयत्नांच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा केली, तर दुसरीकडे आर्थिक शिस्त लावून देश जगातील पाच वरिष्ठ पातळीवरील देशांच्या अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करू लागला आहे.
पुढे बोलतांना आमदार पिंपळे यांनी मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील आजवरच्या १२९६ कोटी ६० लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचाही लेखाजोखा सादर केला. वैनगंगा ते पोनगंगा प्रकल्पाचा आपल्या मतदार संघाला फायदा होईल, एकही रस्ता दूर्लक्षीत रहाणार नाही, तिनही रेज प्रकल्प मार्गी लागतील, सर्व शेतकऱ्यांना पुरेसे बियाणे उपलब्ध होईल, असे अभिवचनही त्यांनी यावेळी दिले. २०२४ मधील आगामी निवडणुकांच्या तयारीचा ही पत्रकार परिषद एक भाग असल्याचे यावेळी आवर्जून त्यांनी नमुद केले.