बीड : सरकार नेहमी सांगत असते, की शेतमालास उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देऊ मात्र प्रत्यक्षात कवडीमोल भाव मिळत असल्याचे आपण पाहत असतो. या बातमीत Onion rate बाबतीत अशीच एक धक्कादायक बातमी आपण जाणून घेणार आहोत. आत्महत्याग्रस्त बीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या व्यथेचे भेसूर वास्तव पाहायला मिळत आहे.
प्रचंड कष्टाने पिकवलेला कांदा विकूनही पदरात काहीच पडले नाही. याउलट आडत दुकानदारालाच पैसे देऊन येण्याची वेळ, बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे ‘तुम्हीच सांगा, आम्ही जगावं की मरावं?’ असा मन सुन्न करणारा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्याने केला आहे.बीड तालुक्यातील नागपूर बुद्रुक गावचे शेतकरी फुलचंद सिंघन यांच्याकडे दीड एकरशेती आहे. या दीड एकरशेतीवरच त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
सोयाबीन पिकाने धोका दिल्यानंतर त्यांनी शेतात कांदा लागवड केली आणि या कांद्यावर सावकाराकडून घेतलेले कर्ज तसेच कांदा उत्पादनासाठी त्यांनी २ हजार रुपये नांगरणीसाठी मोजले. ३ हजार रुपये पेरणीसाठी, एक हजार बैलपाळीसाठी, सात हजारांचे बियाणे, नऊ हजार खुरपणी, १० हजार फवारणी, ३० हजार काढणी, सात हजार २२५रुपये खतासाठी खर्च झाला. शेतात प्रचंड मेहनत केल्यानंतर कांदादेखील चांगला बहरला. यामुळे शेतकरी फुलचंद सिंघन यांच्यासह कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान होते. सोलापूरच्या बाजारात चांगला भाव मिळतो, असा समज असल्याने त्यांनी झालेला ६० गोणी कांदा सोलापूरच्या सिद्धेश्वर आडत बाजारात आणला. यावेळी त्यांच्या कांद्याला डोळेचक्रावतील असा भाव लागला. यात २५ पिशव्यांना दीड रुपया किलोप्रमाणे भाव देण्यात आला. दुसऱ्या २५ पिशव्यांना ५० पैसे प्रतिकिलो भाव मिळाला.
- Advertisement -
- Advertisement -
१० पिशव्यांना एक रुपया किलो भाव देण्यात आला. दोन हजार रुपने आडत, हमाली २३० रुपये, आडत तोलाई १३७ रुपये असा एकूण तीन हजार ८५७ रुपये खर्च झाला. दोन टन ९१६ किलो कांद्याचे २८७१ रुपये आले. त्यापैकी आडतवर ३, ८५७ रुपये खर्च झाला. शेतकऱ्याला ९८६ रुपये खिशातून द्यावे लागले आणि कांदा बाजारात विकावा लागला.आमच्याकडे दीड एकर कांद्यावरच सावकाराकडून घेतलेले पैसे द्यायचे होते. मात्र बाजारात गेल्यावर कांद्याला ५० पैसे प्रतिकिलो भाव लागला. निव्वळ थट्टा झाली. आता सावकाराचे पैसे द्यायचे कुठून? मजूर महिलांचे पैसे द्यायचे कुठून? असे शेतकरी अशोक सिंघनयांनी सांगितले.