Water crisis in Marathwada
Water crisis in Marathwada यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने मराठवाड्यातील धरणांनी तळ गाठायला सुरूवात केली असून जायकवाडी धरणात केवळ १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील ८७७ प्रकल्पांमध्ये आजमितीला केवळ १८.९८ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून या उन्हाळ्यात मराठवाड्यात भीषण पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
धरणांची पाणीपातळी कमी
नेहमी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात गेल्या वर्षीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. मान्सूनचे उशिराने आगमन झाल्याने पेरण्या लांबल्या. जून ते सप्टेंबर २०२३ या मान्सूनच्या काळात सरासरी ८४.५५ टक्के म्हणजे ६७५. ४३ मि.मी. पावसाची नोंद झाली. मान्सूनमध्ये १५.४५ टक्केची घट झाली. त्यामुळे हिवाळ्यापासूनच धरणांची पाणीपातळी घटू लागली आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणांनेही तळ गाठायला सुरुवात झाली असून नाथसागरात केवळ १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठे, मध्यम, लघु प्रकल्प, गोदावरी नदीवरील बंधारे, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधारे असे एकूण ८७७ प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठी १५४७.७१ दलघमी असून ही टक्केवारी केवळ १८.९८ आहे.
मोठी धरणे कोरडीच
विभागातील येलदरीसह सिध्देश्वर आणि माजलगाव, मांजरा, व धाराशिव जिल्ह्यातील सीना- कोळेगाव ही मोठी धरणे कोरडीच आहेत. उन्हाचा पारा वाढायला सुरुवात झाली असून ऐन उन्हाळ्यात मराठवाड्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्यातील पाणीसाठे आटत चालले असून परिणामी टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. सध्यास्थितीत मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ २३.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून १२ एप्रिल रोजीच्या गोषवाऱ्यानुसार ७५ मध्यम प्रकल्पांत ९.८१ टक्के; तर ७४९ लघुप्रकल्पांत २०.२३ टक्केच पाणीसाठा आहे. तसेच गोदावरी नदीवरील १५ प्रकल्पवजा बंधाऱ्यामध्ये २१.५५ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांत १०.९९ पाणीसाठा आहे.
मध्यम प्रकल्पांत केवळ १० टक्के साठा
Water crisis in Marathwada -मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांत केवळ १० टक्केच पाणीसाठा शिल्लक असून छत्रपती | संभाजीनगर जिल्ह्यातील १६ प्रकल्पात केवळ ७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून जालना येथील ७ प्रकल्पात ५ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पात १६ टक्के, लातूर ८ प्रकल्पात ७ टक्के, धाराशिव मधील १७ प्रकल्पांत केवळ ३ टक्के, नांदेड जिल्ह्यातील ९ प्रकल्पात २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून परभणीतील २ मध्यम प्रकल्पात केवळ १ टक्का पाणीसाठा आहे.
- Advertisement -
- Advertisement -